अण्णाभाऊ साठे यांच्या कविता (07+ सुप्रसिद्ध कविता) | Annabhau Sathe Kavita in Marathi | अण्णाभाऊ साठे यांच्यावर कविता


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

अण्णाभाऊ साठे यांच्या कविता | Annabhau Sathe Kavita in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कविता मराठी मध्ये बघणार आहोत. तसे पाहता अण्णाभाऊंचा लेखन प्रपंच हा खूप मोठा आहे. त्यांनी कितीतरी पटकथा, कादंबऱ्या, कविता, लावण्या, पोवाडे लिहिले आहेत.

आज आपण या लेखात अण्णा भाऊ साठे यांच्या 7+ निवडक आणि सुप्रसिद्ध कविता बघणार आहोत. या कविता अण्णा भाऊ साठे यांच्या आहेत. आम्ही फक्त येथे शैक्षणिक दृष्टीकोनातून देत आहोत. यातील दोन कविता अण्णाभाऊ साठे यांच्यावर असणार आहे. त्याचे क्रेडिट आम्ही कवितेच्या शेवटी दिलेले आहे.

अण्णाभाऊ साठे कविता – कविता क्र.01

माझी मैना गावावर राहिली

माझी मैना गावावर राहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
ओतीव बांधा | रंग गव्हाळ | कोर चंद्राची | उदात्त गुणांची |
मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |
हसून बोलायची | मंद चालायची | सुगंध केतकी | सतेज कांती |
घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची | काडी दवन्याची |
रेखीव भुवया | कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हि-याची |
काठी आंधळ्याची | तशी ती माझी गरीबाची |
मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |
नसे सुखाला वाण | तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||

अहो या गरिबीने ताटतुट केली आम्हा दोघांची | झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची |
वेळ होती त्या भल्या पहाटेची | बांधाबांध झाली भाकर तुकड्याची | घालवित निघाली मला
माझी मैना चांदनी शुक्राची | गावदरिला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची |
शिकस्त केली मी तिला हसवण्याची | खैरात केली पत्रांची | वचनांची | दागिन्यांन मडवुन काढायची |
बोली केली शिंदेशाही तोड्याची | साज कोल्हापुरी | वज्रटिक | गल्यात माळ पुतल्याची | कानात गोखरे | पायात मासोळ्या |
दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची | परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची | आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली मी मुंबईची |
मैना खचली मनात | ती हो रुसली डोळ्यात |
नाही हसली गालात | हात उंचावुनी उभी राहिली ||
माझ्या जिवाची होतिया काहिली ||

अहो या मुंबईत गर्दी बेकरांची | त्यात भर झाली माझी एकाची | मढ्यावर पडावी मुठभर माती | तशी गत झाली आमची |
ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जागणा-यांची, मरणारांची, शेंडीची, दाढ़ीची,
हडसनच्या गाडीची, नायलोनच्या आणि जोर्जेटच्या तलम साडीची | बुटांच्या जोडीची |
पुस्तकांच्या थडीची | माडीवर माडी | हिरव्या माडीची | पैदास इथे भलतीच चोरांची |
ऐतखाऊची | शिरजोरांची | हरामखोरांची | भांडवलदाराची |
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची | पर्वा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची |
पाण्यान भरल खीस माझ | वान माला एका छत्रीची | त्याच दरम्यान उठली चळवळ
संयुक्त महाराष्ट्राची | बेळगांव, निपानी, कारवार, गोव्यासह एकभाषिक राज्याची |
चकाकली संगीन अन्यायाची | फ़ौज उठली बिनिवारची | कामगारांची | शेतकरीयांची |
मध्यमवर्गीयांची |
उठला मराठी देश | आला मैदानी त्वेष | वैरी करण्या नामशेष |
गोळी डमडमची छातीवर सहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||

म्हणे अन्ना भाऊ साठे | घर बुडाली गर्वाची | मी-तू पणाची | जुलमाची | जबरिची |
तस्कराची | निकुंबळीला कत्तल झाली इन्द्रजिताची |
चौदा चौकड्याच राज्य रावनाचे | लंका जळाली त्याची | तीच गत झाली कलियुगामधी
मोरारजी देसायाची आणि स.का. पाटलाची | अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची |
परळच्या प्रलयाची | लालबागच्या लढायची | फौंटनच्या चढ़ाइची |
झाल फौंटनला जंग | तिथे बांधुनी चंग |
आला मर्दानी रंग | धार रक्ताची मर्दानी वाहिली ||
माझ्या जिवाची होतिया काहिली ||

महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची | दाखविली रित पाठ भिंतीला लावून लढायची |
परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची | गावाकडे मैना माझी | भेट नाही तिची |
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची | बेलगांव, कारवार, डांग,उंबरगावावर
मालकी दुजांची | दोन खंडनीची | कमाल दंडलीची | चिड बेकिची | गरज एकीची |
म्हणून विनवणी आहे या शिवशक्तिला शाहिराची |
आता वळू नका | रणी पळू नका | कुणी चळू नका |
वेणी माळायची अजुन राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली ||

-: समाप्त :-

अण्णाभाऊ साठे यांच्या कविता – कविता क्र.02

त्याचा शाहिराचा बाणा, आवाज जणू गर्जना
त्याच्या शाहिरीची आग, जनतेची सांगे तगमग

तो सत्तेसाठी लाव्हा, शिवबाचा गनिमी कावा
राजा बोले पकडा धावा, नाक्या नाक्यावर फिल्डिंग लावा

शाहिर तुरुंगामधी बंद केला, राजा घाबरला
क्रांतिकारी तो ढाण्या वाघ, कपटाने डांबला

ऐक सरकारा, तुझ्या लोकशाहीचा बुरखा फाटे टरटरा
न्याय कर भला, आझादी चोरा, तुरुंग शाहिरा
न्याय तुझा भलताच पाषाणी, लावलीस छुपी आणीबाणी

शाहिर सांगतोया गा-हाण, लिवतोया कष्टाच गाण
इथं कुणी उपाशी रस्त्यावरती मरतया
बेकारांच तांडच्या तांड रस्त्यान फिरतया
धर्माच्या नावान कुणी कुणाला चिरतया
धरणीच लेकरू कर्जापोटी मरतया

शाहिर मांडतो वनवास जनतेच्या जुलमाचा
शाहिर वाचतो पाढा राजाच्या जुलमाचा

ऐक सरकारा, तुझ्या लोकशाहीचा बुरखा फाटे टरटरा
न्याय कर भला, आझादी चोरा, तुरुंग शाहिरा
न्याय तुझा भलताच पाषाणी, लावलीस छुपी आणीबाणी

भूमिगत झाला शाहिर, जनतेन दिला आधार
राजा पुरता घाबरलेला, बक्षिस केल जाहीर
राजाच गुप्तहेर खात, शाहिराला शोधी दिन रात
शाहिरांना वाचवी जनता, राजावर केली मात

शाहिर बदली डावाला, बांधून ठेवतो डफाला
देतो विद्रोहाची हाक, तय्यार होई भिडण्याला
आता शाहिर मैदानी आला, अन राजा घाबरला

ऐक सरकारा, तुझ्या हुकुमशाहीचा अंत कराया खरा
देतो इशारा, सोडून दे शाहिरा, उखडण्या तुरा तुझा बघ
जनता टपलीया, तुला गाडाया उठलिया
लाल रंगान नटलिया

क्रांतीसाठी जंग हि छीडली, राजा घाबरला
शाहिरांसव जनता भिडली, राजा घाबरला
जनतेचा लढाऊ बाणा, बंडाची करी गर्जना
जनता संघर्षाची आग, सत्तेला लागते धग
जनता सत्तेसाठी लाव्हा, शिवबाचा गनिमी कावा
राजा बोले धावा धावा,शाहिर बोले फिल्डिंग लावा

ऐक सरकारा, तुझ्या हुकुमशाहीचा अंत कराया खरा
देतो इशारा, सोडून दे शाहिरा, उखडण्या तुरा तुझा बघ
जनता टपलीया, तुला गाडाया उठलिया
लाल रंगान नटलिया …………

-: समाप्त :-

अण्णाभाऊ साठे यांच्या कविता – कविता क्र.03

जग बदल घालुनी घाव

जग बदल घालूनी घाव,
सांगूनी गेले मज भीमराव !
गुलामगिरीच्या या चिखलात,
रूतून बसला का ऐरावत !
अंग झाडूनी निघ बाहेरी,
घे बिनीवरती घाव !
धनवंतानी अखंड पिळले,
धर्मांधांनी तसेच छळले !
मगराने जणू माणिक गिळले,
चोर जहाले साव !
ठरवून आम्हा हीन अवमानीत,
जन्मोजन्मी करूनि अंकित !
जिणे लादून वर अवमानित,
निर्मुन हा भेदभाव !
एकजूटीच्या या रथावरती,
आरूढ होऊनी चलबा पुढती !
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती,
करी प्रगट निज नाव || 1 ||

-: समाप्त :-

अण्णाभाऊ साठे यांच्या कविता – कविता क्र.04

कथा मुंबईची

कथा मुंबईची सुरू आता करतो
इथं माणूस भवऱ्यावाणी फिरतो
इथं दिसती उंच माड्या,
लांब झिपऱ्या शेंड्या दाढ्या
इथं मोकळ्या जागेत गाढवावाणी
खुशाल लोळती कैक झोपड्या
कोण फिरतो देऊन इथे,
कमरेला चिंध्यांच्या तिड्यावर तिड्या
कोण भीक मागतो इथं टेकीत
काठी मारीत उड्यावर उड्या
आणि त्याच्या पुढून उंदरावाणी,
कैक पळती रंगीत मोटारगाड्या
इथं बोळामधील बोळ,
गल्लीमधील पोळ,
रस्त्या रस्त्यावरती खेळ करतो ||1||

-: समाप्त :-

अण्णाभाऊ साठे यांच्या कविता मराठी – कविता क्र.05

महाराष्ट्राच्या अंगणात,
सरिता या खेळ खेळत !
पंचगंगा शीतल शांत,
महाराष्ट्रा शांतवीत!
कोयना कृष्णा चालत,
घालून हातामध्ये हात!
जाऊनी पुढे धावत,
आंध्रलाहि कुरवाळीत!
वारणा वाहे वेगात,
वायूला लाजवीत!
पैठण परभणीत,
गोदाचे रमले चित्त!

-: समाप्त :-

अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी कविता | Annabhau Sathe Poem in Marathi – कविता क्र.06

अण्णा भाऊ साठे

१ ऑगस्ट १९२० रोजी |
सांगली जिल्ह्यात |
जन्मले अण्णा भाऊ |
वाळवा तालुक्यातील वाटेगावात ||

वडीलांचे नाव भाऊ |
आईचे नाव वालुबाई |
अण्णा भाऊंचे |
मूळ नाव तुकाराम ||

मुंबई ते वाटेगाव |
अण्णा भाऊंनी केला |
पायी प्रवास अन् |
झाले मुंबईत दाखल ||

मुंबईत केली नोकरी |
गिरणी कामगार अण्णा भाऊंनी |
लाल बावटा कला पथकाची|
केली स्थापना अण्णा भाऊंनी ||

कष्टकरी श्रमिकांच्या न्यायासाठी |
अण्णा भाऊंनी केले नेतृत्व |
साहित्यातून परिवर्तन निर्मितीसाठी |
अण्णां भाऊंनी मांडल्या व्यथा ||

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र |
आंदोलनातील अगग्रण्य व्यक्तीमत्व |
जगविख्यात साहित्यसम्राट |
म्हणजे अण्णा भाऊ ||

अण्णा भाऊंनी फकीरा कांदबरी |
बाबासाहेबांना अर्पण केली |
बाबासाहेबांचा क्रांतिकारी विचार
जग बदल मनामनात कोरला ||

विषमतेवर केला हल्ला |
घटना व्यक्ती चित्रित करून |
मुंबईची लावणी लिहिली |
शब्दांकित केले प्रवासवर्णन ||

मुंबईतील गोरेगावात अण्णा भाऊंचे |
१८ जुलै १९६९ रोजी झाले निधन |
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंना |
सुभाष करांनी कोटी कोटी वंदन ||

लेखक – सुभाष राघू आढाव

अण्णाभाऊ साठे यांच्यावर कविता | Annabhau Sathe Kavita in Marathi – कविता क्र.07

अण्णा भाऊ साठे

जन्मले ऑगस्ट महिन्यात
थोर असे समाज सुधारक
अण्णाभाऊ साठे नाव त्यांचे
लोकशाहीर आणि लेखक…….१

सांगली जिल्हा वळवा तालुक्यात
वारेगाव असे त्यात एक
बाप भाऊराव आई वालुबाई
त्यांच्या पोटी जन्मला लेक……२

होई जातीभेद खूप
टाकले तरी शाळेत
दिड दिवस राहिले
शिक्षकांनी काढले मारीत…..३

प्रतिभा अंगी तरीही किती!
पस्तीस कादंबऱ्या, पंधरा लघुकथा
लिहती दहा पोवाडा शैलीत गाणी
अन् एक डझन होती पटकथा….४

मुंबईत आले तेथेच रमले
मुंबईची लावणी धारधार
शोषण करणारी इथे जमात
सांगे मुंबईचा गिरणी कामगार….५

फकिरा मिळवी राज्य पुरस्कार
अनुवाद साहित्याचा सर्व भाषेत
डॉ. बाबासाहेबांच्या झुंजार
लेखणीला नम्रपणे करी समर्पित…६

कम्युनिस्ट होवून जातात सोबत
डी. एन. गवेकर व अमर शेख ती
लाल बावटा कला पथक गाजत
देश विदेश ढवळून हो काढती…..७

स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी
वीस हजारांचा मोर्चा काढती
घोषणा गाजे “ये आझादी झुठी है,
देश की जनता भूखी है” सांगती….८

आंबेडकर विचार बाणे अंगी
दलित साहित्य संमेलनात गुढ सांगितली
पृथ्वी ना तरली शेषनाग मस्तकी
दलित कामगार तळहातावर तरली…..९

कार्याची घेत मग दखल
टपाल तिकीट पुण्यात स्मारक
कुर्ला एका उड्डाण पुलास नाव
विकास मंडळ, संमेलन भरती कैक…..१०

वैजयंता, वारणेचा वाघ
अशी ही साताऱ्याची तऱ्हा
कादंबऱ्या अशा हो खास
सात चित्रपटात फकिरा गाजे हा…..११

नाटक शाहीरी पोवाडा
रशियात तो पाहा नेला
शिवराय परदेशी पहिल्यांदा
हा लोकशाहीर घेवून गेला…..१२

पाहा पन्नाशीच्या आतच
केला काळाने कसा घात
लोकशाहीर साहित्यसम्राट
विलिन होई पंचतत्वात…..१३

साहित्य तुमचे वाचता
अंगावर शहारे काटा
मागणे एकच मागतो आता
चालावे आम्हीही तुमच्याच वाटा….१४

लेखक – किशोर झोते

सारांश | अण्णाभाऊ साठे यांच्या कविता मराठी | Annabhau Sathe Kavita in Marathi

मित्रांनो, वरील लेखात आपण अण्णाभाऊ साठे यांच्या कविता बघितल्या. त्याचप्रमाणे आपण अण्णाभाऊ साठे यांच्यावर कविता बघितल्या. मित्रांनो या वरील कविता आमच्या नाहीत. या कविता अण्णाभाऊ साठे आणि इतर कविता या ज्यांच्या आहेत त्याची नावे आम्ही कवितेच्या शेवटी दिलेली आहेत. या कविता आम्ही फक्त शैक्षणीक दृष्टीकोनातून येथे दिलेल्या आहेत.

याचा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना व्हावा हाच आमचा हेतू आहे. मित्रांनो आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या मित्रांना अण्णाभाऊ साठे यांच्या कविता नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

2 thoughts on “अण्णाभाऊ साठे यांच्या कविता (07+ सुप्रसिद्ध कविता) | Annabhau Sathe Kavita in Marathi | अण्णाभाऊ साठे यांच्यावर कविता”

  1. खुप सुंदर आपला हा उपक्रम स्त्युत आहे. आपल्या कार्यास हार्दिक, हार्दिक शुभेच्छा..
    मी ही अण्णाु भाऊ साठे यांच्यावरती कविता हिंदी मधुन लिहिली आहे. आपल्या ब्लॉगवरुन प्रका‍शित करावी ही विनंती.

    वीर सपुत अण्णा

    जन्मा वह वीर सपुत
    1 अगस्त 1920 को
    कलम की ताकद से
    विश्‍व को दिखलाया
    भारत के सच्चे चित्र को

    गुलामी की अवस्था में
    जी रहे उन अकिंचनों का
    भुखें बच्चें,मर्द,औरतें,बुढों का
    सच्चे चित्र को शब्दों में ढालकर
    नींव बनाई नए भारत की

    कदम-कदम चलकर
    उन गरिबों की गलियोें में
    जहाँ जाने से कतरातें थे
    लोग सदियों से
    कलम की ताकद से
    किया प्रहार उस अछुति प्रथा पर

    श्रमिकों को न्याय दिलाने
    उनके अधिकारों की रक्षा करने
    निकल पडा वह मसिहा
    स्थापन कर लाल बावटा
    कला पथक को

    परिवर्तनवादी साहित्य सृजन कर
    संयुक्‍त महाराष्ट्र निर्माण करने की
    दी प्रेरणा भारतीयों को शब्दों से
    नया इतिहास निर्माण करने की,

    संत तुकाराम की बाणी, सोंच
    अण्णा (तुकाराम) के साहित्य में
    समाज परिवर्तन का वह जजबा
    संत तुकाराम की तरह अण्णा में

    जन्मा वह वीर सपुत
    1 अगस्त 1920 को
    कलम की ताकद से
    विश्‍व को दिखलाया
    भारत के सच्चे चित्र को

    डॉ. बालाजी गो. कारामुंगीकर
    मो.नं. 9823112907

Leave a Comment